Showing posts with label oldage homes. Show all posts
Showing posts with label oldage homes. Show all posts

Thursday, 29 December 2016

वृद्धापकाळ- एक शाप ?

वृद्धापकाळ म्हणजेच जीवनाचा अंतिम टप्यातील प्रवेश..

जीवनाच्या अंतिम टप्याबरोबरच संपूर्ण आयुष्यातील भूतकाळ आठवण्याचा पण काळ आहे हा वृद्धापकाळ, कारण ह्या टप्प्यावर आयुष्यातील बरेच सोबती जसे की आपला जीवनसाठी, मित्र, आई-वडील ह्या पैकी बरेच लोकं आपल्या सोबत नसतात..
ज्यांच्या सोबत राहून आपण आपले आयुष्य आनंदात घालवतो, त्यांची आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केल्यावर आठवण येणे साहजिकच आहे.
आपले सखे-सोबती ह्या टप्प्यात पण आपल्या सोबत असतील तर उर्वरित आयुष्य पण आपले सुखी होयील,
परंतु ह्या सर्वांच्या अनुपस्थितीत उर्वरित आयुष्य एकटेपणात घालवावे लागणे हे पण एक दुर्दैवच आहे..

ह्या बद्दल बोलण्याचे माझे कारण की मला आलेलाएक अनुभव होय, तो मी तुम्हाला येथे सांगू इच्छितो..

मी रेल्वे स्टेशन वर असलेल्या ATM च्या रांगेत उभा होतो, नोटबंदी चा काळ असल्यामुळे गर्दी थोडी जास्तच होती, म्हणून सवयीप्रमाणे मोबाईल काढला व त्यावर टाईमपास करण्याचा प्रयत्न करू लागलो..
तेवढ्यात कुणाचा विव्हळण्याचा आवाज आला म्हणून मागे बघितले तर एक म्हातारी आजी थंडीत कुडकुडत बसलेली दिसली व तिच्या आजूबाजूला २-४ टारगट मुले हसताना दिसली. एव्हाना रांगेतील माझ्यासह एक-दोघांचे लक्ष गेले आम्ही तेथे गेलो तर प्रकार लक्षात आला..

शक्यतो कुठल्याही स्टेशन परिसरात बरेच वृद्ध भिकारी झोपलेले असतात, तसेच तेथेही होते..
अशीच ही नव्वदितील म्हातारी आजी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून कुठलीशी मळकट फाटलेली चादर ओढून स्वताचा बचाव करीत झोलेली होती, बाजूलाच एक भांडे होते, त्यात काही कलदार होती; थंडीपासून बचाव करण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न कोण पासूनच लपत नव्हता..
तिथे बाजूला ही टारगट मुले उभी होती, त्यातील एकाचे लक्ष म्हातारीच्या जमा केलेल्या नाण्यांच्या भांड्यावर गेले; त्याने त्यातील नाणे घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आजीने ते स्वताच्या चादरी मधे ओढून घेतले.
तर त्यातल्या एकाने थंड पाणी त्या बिचाऱ्या म्हातारीच्या पायावर टाकले, व ती आजी थंडीने कुडकुडून उठून बसली..

त्या मुलांना तेथून समज देऊन हाकल्यावर आजीला चहा व खायला आणून दिल्यानंतर आम्ही सर्वच हळहळत आपापल्या जागेवर परत गेलो..
माझे पैसे काढून परत जाताना; मी परत त्या आजीजवळ गेलो व तिला विचारपूस केली की ती कुठली आहे, तीला कुठे जायचे आहे; तर आजी ने तिच्या मोडक्या-तोडक्या भाषेत थोडक्यात कथा सांगितली व मी एकदम अवाक झालो..

आजीला २ मुले चांगल्या नोकरीवर होती, सूना होत्या नातवंडे होती; नोकरी निमित्ताने मुले आपापल्या परिवारासह दुसऱ्या गावी रहात होती तर एकट्या आजीला सून व मुले 'शहरात ठेवण्याचा त्रास होतो' ह्या कारणाने सोबत नेत नव्हती.परंतु  दोघेही एक दिवस आले व  सहा-सहा महिने आम्ही दोघेही तुला सांभाळू असे म्हणून राहते घर विकून आजीला रेल्वेत बसवून दोघेही कुठेतरी गायब झाले..
जसे गाडीने स्टेशन सोडले तसेच आजीच्या भूतकाळाने पण साथ सोडली, बरेच दिवस ती स्टेशन बदलत होती ;
ह्याच अपेक्षेने की कधी तरी तिची मुले तिला शोधात येतील ..
आता तर आजीला स्वतःचा नाव,गावाचं नाव काहीच नाही आठवत ..

मी ऐकल्यावर थोडा सून्न झालो मग एका समाजसेवी संस्थेला आजीचा ताबा दिला..


आता हे सर्व ऐकल्यावर नेमके दोष कोणाचा ?

त्या आईचा जिने अश्या मुलांना जन्म दिला की त्या मुलांचा, ज्यांनी आपल्या आईला मरणाच्या दारात सोडून दिले..

ज्या आई-वडिलांनी आपल्याला  कष्टाने लहानाचे मोठे केले, कमीतकमी आपले कर्तव्य आहे की त्यांना त्यांच्या म्हातारपणी आपली सोबत असावी;

आपण लहानपनी आजारी असताना कित्येकदा आपल्याला कुरवाळत झोपेविना किती तरी रात्री गमावल्या असतील, मग आता आपले कर्तव्य आहे की त्यांच्या म्हातारपणी त्यांची सेवा-सुश्रुषा करावी..

आई-वडिलांचे ऋण आपण कुठल्याही प्रकारे फेडू शकत नाही परंतु कमीतकमी त्यांच्या उतारवयात त्यांना आनंद देऊन त्यांचे दुख कमी तरी करू शकतो ;
असे म्हणतात की ज्यांना आई-वडील नसतात त्यांनाच त्याची खरी किंमत कळते, मग आपल्याला आई-वडील आहेत तर आपल्याला त्यांची खरी किंमत का कळू नये..
  
आपल्या आई-वडिलांच्या अति काळजीमुळेच आपण कित्येकदा भांडतो , त्यांना कितीही दुख झाले त्या गोष्टीचे तरी ते कळू देत नाही पण आपण ह्याची जाणीव ठेवायला हवी की त्यांना दु:ख होता कामा नये ..

काहीही होऊ दे पण कुठलीच आई किंवा वडील असे स्टेशन वर उर्वरित आयुष्य काढताना दिसता कामा नये ..